दुमालं आज दहा वर्षे झालीयत त्या गोष्टीला पण माझ्या नकळत्यापणात झालेले व्यवहार आणि नैसर्गिक प्रकोप या गोष्टींची भिती आजही ठळकपणे आहे. २००८ च्या उतरा आणि हात्तीच्या अवकाळी पावसानं घराची पाठभिंत पाडली. मी नुकताच दहावीत जाणार होतो. वडिलांची तितकी मदत होत नव्हती. त्यांच्या दारुमुळं. आयनं गळ्यातला सर गहाण ठेवला आण भिताडाला पैसं उचाललं. हाय त्याच घराच्या तोड्या वापरून पांढऱ्या मातीत माचून घेतलं. शिमेटाचं करायला दातावर आमच्या तेवढं मास नव्हतं. घराला माळी असल्यानं घर उगाच मोठं वाटत होतं म्हणून चारी भिंती दोन दोन हात उतरून घेतल्या. नवीन बॅटन वापरून कवलं झाकून घेतली. कामापुरतं राह्याला झालं होतं म्हणून आय म्हणली दुमालं घालायला चार महिन्यानं बघूया. आता पैशी नाहीती तेवढं .घरबांधकामाच्या महिनाभराच्या जंजाळात बापानं चालता बोलता एका रात्री शेवटचा श्वास घेतला. रचलेल्या घराचं कोळसं झाल्यागत झालं. सारंच अडून बसलं व्हतं आता. रडून रडून आयच्या डोळ्याची कोरडी विहीर झाली होती. धीर सोडला हुता तीनं. बहिण तापानं फण...